HELLO CHANDA NEWS
चंद्रपूर,(का.प्र.) : भाजपा कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय चिंतनाबरोबरच पक्षाच्या संघटनात्मक शक्तीचा प्राधान्याने विचार करायचा आहे.
सीमेवर सैनिक जे कर्तव्य बजावतो तेच कर्तव्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पक्ष हितासाठी समर्पित भावनेतून पार पाडले पाहिजे असे आवाहन पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी वलनी-बोर्डा येथे पंडित दीनदयाल उपाध्याय जिल्हा प्रशिक्षण अभियान-2026 अंतर्गत आयोजित पदाधिकारी कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरास संबोधित करतांना केले.
निलावार फार्म येथे 24 मे 2026 रोजी पार पडलेल्या या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी हंसराज अहीर यांनी सांगितले की, प्रशिक्षण वर्गास उपस्थित असलेले आम्ही सर्व समान आहोत ही भावना व वागणूक असेल त्यालाच पक्ष म्हटल्या जाते.
भाजपाद्वारे अश्या प्रकारचे अभ्यास वर्ग व प्रशिक्षण शिबीर संपूर्ण देशभरातच सुरु असून अशा आयोजनातून बोध घेत कार्यकर्त्यांनी जबाबदारीचे निर्वाहन केले पाहिजे असे अहीर म्हणाले.
आपल्यावर पक्षाचे फार मोठे ऋण आहे त्यामुळे पक्ष बांधणी व मजबूत संघटन उभे करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे.
करोडो सदस्यांमधून आपणास या प्रशिक्षण शिबिरास उपस्थित राहण्याची संधी मिळाली हा पक्षाने आपल्यावर ठेवलेला विश्वास आहे.
पक्ष वाढीसाठी लोक संपर्काला विशेष महत्व असतो, त्याशिवाय राजकारण करता येत नाही व तसा प्रयत्न तुम्ही करूही नये.
प्रथमतः राष्ट्र, तद्नंतर पक्ष व कुटुंब हे कार्यकर्त्यांचे ध्येय असले पाहिजे, कारण आपले कार्य हे समाजासाठी आहे, यातूनच आपणास प्रबळ संघटन निर्माण करायचे आहे.
राष्ट्र चिंतन, राष्ट्र सुरक्षा, सीमेचे रक्षण व पक्ष बांधणी हे विचारच राष्ट्राच्या समृद्धीला हातभार लाऊ शकतात.
कार्यकर्त्यांशी संवाद साधतांना हंसराज अहीर यांनी गटबाजीला पक्षात थारा नकोय हे सांगतानाच सर्वांशी संपर्क ठेवत पक्ष मजबूत करणे हे आपले लक्ष्य असले पाहिजे, प्रवासातून कार्यकर्त्यांशी संपर्क, नवख्या कार्यकर्त्यांची विचारपूस हेच पक्षाला मजबुतीकडे घेऊन जाते.
भाजप पदाधिकाऱ्यांनी पदाची गरिमा जपली पाहिजे असेही ते म्हणाले.
पक्ष स्थापनेपासूनच भाजपाने संघटन मजबुतीला महत्व देण्याचे भूमिका स्वीकारली आहे, दर तीन वर्षांनी संघटन स्तरावरील निवडणुका होत असल्यामुळेच देशातील सर्वात मोठा राजकीय पक्ष म्हणून भाजपाची ओळख आहे.
त्यामुळेच आज पक्ष पूर्वोत्तर भागातही पोहोचला आहे. आपला पक्ष व्यक्तीपुजक नसून सर्व समावेशक भूमिका बाळगणारा आहे. राष्ट्रवादी विचाराच्या पक्षाचे आपण कार्यकर्ते आहोत व पक्षाला डाॅ. शामाप्रसाद मुखर्जी, पं. दीनदयाल उपाध्याय, श्रद्धेय अटलजी यांच्या सारख्या महान व्यक्तित्वांच्या विचारांची देणगी आम्हास लाभली असल्यामुळे आपल्या कार्यकर्तृत्वाची व पक्षाची उंची वाढविण्याची जबाबदारी आपण सर्वांची आहे.
रामभाऊ म्हाळगी म्हणायचे की पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी तोंडात साखर ठेऊन राहील पाहिजे त्यामुळे स्वतःला व्यक्तीपुजक, निंदक व इतरांच्या उणीवा शोधण्यापासून दूर ठेवले पाहिजे कोणताही कार्यकर्ता दुखावल्या जाणार नाही याची काळजी घ्यावी, तेव्हाच पक्ष संघटन टिकाऊ बनते असेही हंसराज अहीर यांनी या प्रशिक्षण शिबिरास उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधतांना म्हणाले.
याप्रसंगी आ. किशोर जोरगेवार, प्रभारी चंद्रपूर जिल्हा महानगर श्रीमती अर्चना डेहनकर, प्रदेश भाजपा ओ.बी.सी. मोर्चा उपाध्यक्ष डाॅ. अशोक जीवतोडे, जेष्ठ नेते विजय राऊत, माजी महापौर अंजली घोटेकर, माजी उप महापौर अनिल फुलझेले, प्रशिक्षण वर्ग प्रमुख रवींद्र गुरनुले, सुभाष कासनगोट्टूवार, तुषार सोम, युवा नेते रघुवीर अहीर यांचेसह मान्यवर, प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


























