चंद्रपूर जिल्ह्यातील पूर परिस्थितीत ही महावितरण डगमगली नाही – मुख्य अभियंता सुनील देशपांडे

0
100

चंद्रपूर : अन्न , वस्त्र , निवारा याप्रमाणेच वीज ही मनुष्याची प्राथमिक गरज आहे . त्यामुळेच ग्राहकांना अखंड वीज पुरवठा देणे , हे महावितरण कंपनीचे मुख्य ध्येय आहे , असे प्रतिपादन महावितरणचे मुख्य अभियंता सुनील देशपांडे यांनी केले .
चिमूर येथे ऊर्जा विभागाच्या वतीने आयोजित उज्वल भारत , उज्वल भविष्य या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते . यावेळी मंचावर भद्रावती पॉवर ग्रीडचे मुख्य महाप्रबंधक अरिन्दमसेन शर्मा , चंद्रपूर मंडळाच्या अधिक्षक अभियंता संध्या चिवंडे , महापारेषणचे अधिक्षक अभियंता प्रफुल अवघड , चिमूरचे उपविभागीय अधिकारी प्रकाश संकपाळ उपस्थित होते .
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ऊर्जा विभागाच्या वतीने 25 ते 30 जुलै या कालावधीत संपूर्ण देशात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे , असे सांगून मुख्य अभियंता श्री . देशपांडे म्हणाले , चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूरला शहीद क्रांतीचा मोठा वारसा लाभल्यामुळे या ऊर्जा महोत्सवासाठी चिमूरची निवड करण्यात आली आहे . आजच्या काळात वीज ही नागरिकांची प्राथमिक गरज आहे . महावितरण ही ऊर्जा क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी आहे . ग्राहकांना अखंड वीज पुरवठा देणे , हे कंपनीचे मुख्य ध्येय आहे . गत आठवड्यात चिमूर मध्ये आलेल्या पूर परिस्थितीत महावितरणच्या सर्व अधिकारी – कर्माचा – यांनी वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी अखंड सेवा दिली . हे नक्कीच कौतुकास्पद आहे , असे ते म्हणाले . यावेळी प्रफुल अवघड म्हणाले , विभागाचे चांगले काम लोकांपर्यंत गेले पाहिजे , ग्राहकांना चांगली सेवा देणे , हे आपले प्राथमिक कर्तव्य आहे . त्यामुळे कंपनीची प्रतिमा आणखी चांगली होईल . अरिन्दमसेन शर्मा म्हणाले , ऊर्जा क्षेत्रात केंद्र सरकारने मोठी मजल मारली आहे . आज भारत , शेजारी देशातसुद्धा विजेची निर्यात करतो . 2030 पर्यंत अक्षय ऊर्जेचे गाठावयाचे लक्ष भारताने 2021 मध्येच पूर्ण केले आहे , असे त्यांनी सांगितले . तर उपविभागीय अधिकारी श्री . संकपाळ म्हणाले , चंद्रपूर हा ऊर्जा निर्माण करणारा जिल्हा आहे . येथे विद्युत विभागाचे काम चांगले असल्यामुळे नागरिकांच्या तक्रारी कमी आहेत . ही बाब अभिनंदनीय असून ग्राहकांना आणखी चांगली सेवा देण्यासाठी विभागाने प्रयत्नशील राहावे . तसेच नागरिकांनी शासकीय योजनांचा लाभ घ्यावा , असे आवाहन त्यांनी केले .
प्रास्ताविकातून अधिक्षक अभियंता श्रीमती चिवंडे म्हणाल्या , उज्वल भारत , उज्वल भविष्य ऊर्जा महोत्सव अंतर्गत जिल्ह्यात चिमूर आणि मूल ( 30 जुलै ) या दोन ठिकाणी या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे . पारंपरिक आणि अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रातील 2047 पर्यंत ध्येय निश्चित करण्यात आल्याचे त्यांनी संगितले . यावेळी मान्यवरांच्या हस्ते विद्युत विभागाच्या योजनांचा लाभ घेतलेल्या नागरिकांना प्रशस्तिपत्र देवून गौरविण्यात आले . यात जितेंद्र गोनेवार , विठोबा झिंगरे , किसन मांडवकर , लिलाधर जांभूळे , अजहर शेख आदिंचा समावेश होता . कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांनी दीप प्रज्वलन करून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि शहीद बालाजी रायपुरकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण केले . यावेळी मागासवर्गीय मुलींचे शासकीय वस्तीगृह येथील मूलींनी स्वागतनृत्य सादर केले . कार्यक्रमाचे संचालन सुशील सहारे यांनी केले . यावेळी विभागाचे कार्यकारी अभियंता सचिन घडोले ( वरोरा ) , सुहास पडोळे ( चंद्रपूर ) , विजय राठोड , उपकार्यकारी अभियंता संजय जळगावकर यांच्यासह सर्व अभियंते , शाखा अभियंते , उपअभियंते , इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते . कार्यक्रमाची सांगता आदिवासी नृत्याने झाली .

*”हेलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here