अतिक्रमणधारकांना 111 निवासी पट्ट्यांचे वाटप.
HELLO CHANDA NEWS
चंद्रपूर,(का. प्र.) – महाराष्ट्रातील अनेक गावांमध्ये पट्टे मिळावेत, अशी नागरिकांची अपेक्षा असताना बल्लारपूरने सर्वात वेगाने पट्टे वितरणाची गती साधली आहे, हा अभिमानास्पद क्षण असल्याचे मत राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा आ. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले.
कार्यकर्ते, पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांच्या समन्वयातून हा उपक्रम यशस्वीपणे राबविला जात असून, बल्लारपूरला महाराष्ट्रात पट्टे वितरणाच्या बाबतीत प्रथम क्रमांकावर आणण्याचा माझा संकल्प असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
शासकीय विश्रामगृह, बल्लारपूर येथे अतिक्रमणधारकांना पट्टे वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी माजी वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल,भाजपा जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा,नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विशाल वाघ यांची उपस्थिती होती.
आ. सुधीर मुनगंटीवार म्हणाले, ‘पट्टे देण्याच्या कामाला बल्लारपूरमध्ये आणखी गती देणार आहे. महाराष्ट्रातील अनेक गावांमध्ये पट्टे मिळावेत, अशी नागरिकांची इच्छा आहे. आज 111 रहिवाशांना पट्टे देण्यात येत आहेत, तर यापूर्वी 251 पट्ट्यांचे वितरण झाले आहे. एकूण 362 अर्ज निकाली निघाले असून 894 अर्जांवर कार्यवाही सुरू आहे. वर्षभरात 4 हजार 500 पट्टे देण्याचा मानस आहे. प्रत्येक शेवटच्या पात्र व्यक्तीपर्यंत जमिनीचा पट्टा पोहोचेपर्यंत विश्रांती नाही.
आवास योजनेमध्ये जमीन असल्याशिवाय पुढे जाता येत नाही. त्यामुळे प्रत्येक गरीब कुटुंबाला स्वतःच्या जमिनीचा अधिकार मिळवून देण्यासाठी अथक प्रयत्न सुरूच राहतील, असा निर्धार आ.मुनगंटीवार यांनी यावेळी व्यक्त केला.
प्रातिनिधीक स्वरूपात अतिक्रमणधारकांना पट्ट्याचे वाटप:
बल्लारपूर मधील सागर जुनघरे, चंद्रशेखर लिचोडे, लक्ष्मी डोंगरवार, मन्सूर शेख, कविता किन्हेकर, वैभव कायरकर, किशोर कायरकर, मंगलसिंग जाधव, शलिता कोवे, नरसिंगराव नरगुला, परविन शेख, शफी खान आदी अतिक्रमणधारकांना प्रतिनिधिक स्वरूपात आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते पट्ट्यांचे वाटप करण्यात आले.































