नियमित कर्जफेड करणाऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान देऊन बळीराजाचा सन्मान माजी अर्थमंत्री आ.सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून शिंदे-फडणवीस सरकारचे अभिनंदन

0
89

नियमित कर्जफेड करणाऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान देऊन बळीराजाचा सन्मान

माजी अर्थमंत्री आ.सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून शिंदे-फडणवीस सरकारचे अभिनंदन

गेल्या दोन वर्षांपासून वेगवेगळ्या आपत्तींना तोंड देतानाही नियमित कर्जफेड करणाऱ्या बळीराजाला ५० हजार रु. पर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्याचा निर्णय घेऊन राज्यातील १४ लाख शेतकरी कुटुंबाना दिलासा दिल्याबद्दल भाजपाचे जेष्ठ नेते,माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारचे अभिनंदन केले आहे.

नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन रक्कम देण्याचे आश्वासन देऊनही महाविकास आघाडी सरकारने त्याची अंमलबजावणी केली नाही. केवळ कागदी घोषणा करून दोन वर्षे शेतकऱ्याची फसवणूक करणाऱ्या ठाकरे सरकारमुळे निराश झालेल्या शेतकऱ्यास या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळाला आहे, असे आ. सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.

शिंदे-फडणवीस सरकारच्या या निर्णयामुळे १४ लाख शेतकऱ्यांच्या सहा हजार कोटींच्या कर्जाचा बोजा हलका होणार असून थेट ऑनलाईन पद्धतीने अनुदानाची रक्कम शेतकऱ्यास मिळणार असल्याने मदतीसाठी हेलपाटे न घालता शेतकऱ्याची प्रतिष्ठा जपण्याची सरकारची भावना महत्वाची आहे, असे आ. सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे. २०१९ मध्ये अतिवृष्टी, महापुर यासारख्या नैसर्गिक आपत्तींमुळे अतोनात नुकसान झालेला शेतकरी प्रत्यक्षात अडीच वर्षे मदतीपासून वंचित राहिला होता. ठाकरे सरकारने केवळ घोषणांचे गाजर दाखवून शेतकऱ्याची उपेक्षा केली. या आपत्तींनंतरच्या कर्जमाफीस पात्र ठरलेल्या शेतकऱ्यालादेखील भाजप-सेना युती सरकारच्या नव्या प्रोत्साहनपर योजनेत समाविष्ट केल्याबद्दल आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत.

राज्यातील ब्रह्मगव्हाण, वाघूर आणि भातसा प्रकल्पांसाठी साडेचार हजार कोटींचा निधी मंजूर करून कृषी आणि नागरी पाणीपुरवठा योजना अधिक सक्षम करण्याच्या निर्णयावरही आ. सुधीर मुनगंटीवार यांनी समाधान व्यक्त केले आहे. ठाकरे सरकारच्या काळात राज्याच्या थंडावलेल्या प्रगतीला शिंदे-फडणवीस सरकारमुळे वेग येत असल्याचा दावाही त्यांनी केला. शेतकऱ्याची समस्यामुक्ती आणि शहरी भागाचा विकास यांचा योजनापूर्वक समतोल साधणारी युती सरकारची वाटचाल महाराष्ट्राला पुन्हा वैभव मिळवून देईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे

*”हेलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here