==============================
पीएम विश्वकर्मा योजना मार्गदर्शन कार्यक्रम, सुतार (झाडे) समाजाचे आयोजन ========≠======================= शासनाच्या अनेक योजना आहेत. मात्र त्या शेवटच्या गरजू घटकापर्यंत पोहोचविण्याचे मोठे आव्हान राहिले आहे. परिणामी अनेक पात्र लाभार्थी अशा समाजउपयोगी योजनांपासून वंचित राहत आहेत. मात्र सुतार (झाडे) समाजाने आज पीएम विश्वकर्मा योजना मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करत सदर योजनेचे फायदे समाजाला पटवून दिले आहेत. हे आयोजन नक्कीच समाजातील कुशल कामगारांच्या उज्ज्वल भविष्यासाठीचे महत्त्वाचे पाऊल ठरेल असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले. ================================ सुतार (झाडे) समाज महासंघ आणि महाराष्ट्र राज्य विश्वकर्मीय सुतार समाज समन्वय समिती तसेच महासंघांतर्गत महासंघ सखी व युवा मंच यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकच्या सभागृहात सुतार (झाडे) समाज आर्थिक महामंडळ तसेच पीएम विश्वकर्मा योजना मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी आ. जोरगेवार बोलत होते. या कार्यक्रमाला सेवा निवृत्त को-ऑपरेटिव्ह अधिकारी माणिकराव गहोकर, माजी प्रादेशिक व्यवस्थापक राजेंद्र राजुरकर, मेहकर विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. संजय रायमुलकर, विद्यानंद मानकर, नारायण क्षीरसागर, मुकेश मुंजनकर, प्रदीप जानवे, ज्योती राखुंडे, सतीश माणुसमारे, यांच्यासह इतर मान्यवरांची मंचावर उपस्थिती होती. ================================ यावेळी पुढे बोलताना आ. जोरगेवार म्हणाले की, सुतार समाज हा कष्टकरी समाज आहे. या समाजाच्या हाताला कला-कौशल्य आहे. मात्र आता नवी पिढी रोजगाराकडे वळल्याने ही अमूल्य संपत्ती नष्ट होत आहे. आपण उच्च शिक्षण घेतले पाहिजे. मात्र त्याचबरोबर आपला पारंपरिक व्यवसायही आपण केला पाहिजे. या व्यवसायाला नव्या तंत्रज्ञानाची जोड देत एका वेगळ्या पद्धतीने आपण आपल्यातील हस्तकलेचे कौशल्य जगासमोर नेले पाहिजे असे यावेळी आ. जोरगेवार म्हणाले. ==================================== प्रत्येक समाजाच्या विकासात आणि प्रगतीत कामगार, कारीगर आणि छोटे उद्योजक यांचे योगदान अनमोल असते. आपल्या देशातील विविध क्षेत्रातील कुशल कामगारांनी आपल्या कौशल्यांनी देशाची अर्थव्यवस्था बलशाली केली आहे. पीएम विश्वकर्मा योजना या सर्व कुशल कामगारांसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. आपल्या कारीगरांना आणि कुशल कामगारांना त्यांचे कौशल्य अधिकाधिक विकसित करण्याची संधी देणे आणि त्यांना आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी बनवणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. आपल्या देशात विश्वकर्मा समाजाच्या पारंपारिक कौशल्यांचा विकास करण्यासाठी ही योजना महत्त्वपूर्ण आहे. या योजनेद्वारे आपल्या उत्पादनांचे ब्रँडिंग, आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख आणि जागतिक बाजारपेठेत त्यांना स्थान मिळवून देण्याचे काम केले जाते. ही योजना आपण समाजाच्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचविल्यास समाजातील कारीगर आणि कुशल कामगारांना एक नवीन दिशा मिळेल. त्यांना त्यांचे काम अधिक प्रभावीपणे करण्याची संधी मिळेल. आजचा हा मार्गदर्शन कार्यक्रम महत्त्वपूर्ण आहे. या कार्यक्रमातून आपण या योजनेची माहिती आपल्या गावांमध्ये, शहरांमध्ये आणि आपल्या परिवारांमध्ये पोहोचावी, त्यांना या योजनेत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करावे असेही यावेळी आमदार किशोर जोरगेवार म्हणाले. या कार्यक्रमाला समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. ================================== *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.* ==================================
कार्यकारी संपादक शशिकांत मोकासे संपादक :- शशि ठक्कर , 9881277793,9022199356 उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,























