अर्ध शतकांनंतरही सावरकरांची अवहेलनाच.

0
48
डॉ सच्चिदानंद शेवडेंनी व्यक्त केली खंत

व्यख्यानमालेचे दुसरे पुष्प

लंडनच्या ओल्ड इंडिया हाऊस वर लंडन म्युनिसिपल कौन्सिलने, सावरकर तिथे राहत असल्याचा नीलफलक लावला आहे. आपल्या देशात मात्र सावरकर असतानाही आणि ते गेल्यानंतर अर्धशतकाहून अधिक काळ उलटून गेल्यावरही त्यांची अवहेलनाच होत आहे याचे आश्चर्य वाटते. नेल्सन मेंडेला त्याच्या देशाकरता सत्तावीस वर्ष तुरुंगात राहिला. त्याला आपल्या देशातील ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च पुरस्कार दिला जातो, मात्र तेवढीच वर्ष आपल्या देशाकरता बंदीवासात राहिलेल्या सावरकरांकडे दुर्लक्ष केले जाते, याला नेमके काय म्हणावे? असा प्रश्न ज्येष्ठ विचारवंत डॉ.सच्चिदानंद शेवडे यांनी उपस्थित केला. स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवीवर्ष आल्यावरही  वीर सावरकरांना ‘भारतरत्न’याची खंत त्यांनी वीर सावरकर एक झंझावात या विषयावरील व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प गुंफतांना मंगळवार 9 ऑगस्टला व्यक्त केली.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ सुभाष बोकारे,डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालयाचे सचिव अनील बोरगमवार,कोषाध्यक्ष राजीव गोलिवार,प्रकाश धारणे,भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ मंगेश गुलवाडे,इंजि.सुभाष कसंगोट्टूवार,पुरुषोत्तम सहारे,शीला चव्हाण,प्रमोद क्षीरसागर,साक्षी कार्लेकर,छबु वैरागडे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

डॉ शेवडे म्हणाले,आज स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात, स्वातंत्र्य मिळवण्याकरता जे जे मार्ग अवलंबले गेले, त्या त्या सर्व मार्गांचा आणि ते अवलंबणाऱ्या सर्व लोकांचा यथोचित सन्मान होणे आवश्यक आहे, तरच ‘घर घर तिरंगा’ या मोहिमेला आवश्यक ते बळ प्राप्त होऊ शकेल, असे सांगून डॉक्टर शेवडे पुढे म्हणाले की, सावरकरांनी मार्सेलिसमध्ये जी बोटीतून उडी मारली ती जगात गाजली. त्याला कारण अज्ञात असलेल्या समुद्रात मारलेली उडी होय. या उडीबद्दल जगातील 114 वृत्तपत्रात बातमी आली होती. त्या उडीबद्दल बोलताना कवी मनमोहन नातू म्हणतात,
‘दुनियेत फक्त आहेत
विख्यात बहाद्दर दोन,
जे आई गेले आई करता
सागरास पालांडून,
हनुमंता नंतर आहे
या विनायकाचा मान,
लावूनिया प्राण पणाला
अस्मान कडाडून गेला
सावरकरांची बोटीतून….. सावरकरांनी मारलेली उडी ही समजून उमजून केलेली चाल होती. यामागे जे राजकारण होते ते आणि पुढे हेगच्या आंतरराष्ट्रीय लवादापुढे सावरकरांची केस जाणे, हा सर्व भाग अत्यंत रोचक आहे.
पुढे सावरकरांना अंदमानमध्ये जावे लागले आणि अंदमानमध्ये ज्या हालअपेष्ठा त्यांनी आणि इतर क्रांतिकारकांनी सहन केल्या, त्याचे वर्णन डॉ. शेवडे यांनी केले. सावरकरांच्या कथित माफीनाम्याबद्दलही त्यांनी स्पष्ट ऊहापोह केला आणि ‘ॲम्नेस्टी पिटीशन’ याला मराठीत प्रतिशब्द नसल्याचे स्पष्ट केले. सावरकरांवर यावरून अकारण गदारोळ माजवला जातो हे ही त्यांनी स्पष्ट केले.
पुढे रत्नागिरीमध्ये सावरकर राहिले. तेथील स्थानबद्धतेतून सुटका, तिथे केलेले समाजकार्य, सामूहिक पंगत, मराठी भाषा शुद्धीचे कार्य आदी भागापासून स्वराज्य मिळाल्यानंतर सावरकरांना गांधीहत्येच्या खटल्यात कसे गोवले गेले याचेही वर्णन डॉ. शेवडे यांनी केले. त्यातून त्यांची निर्दोष व निष्कलंक सुटका होऊनही त्यांच्यावर खोटे आरोप वारंवार करणे हा उबग आणणारा प्रकार असल्याचे त्यांनी सांगितले.
एकूणच सावरकरांच्या झंझावाती जीवनाचा एक पटच डॉ. शेवडे यांनी त्यांच्या चित्रदर्शी शैलीत सादर केला.

प्रारंभी डॉ सुभाष बोकारे व डॉ शेवडे यांचे हस्ते भारतमाता,वीर सावरकर व डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व दीप प्रज्वलन करून वीर सावरकर एक झंझावात भाग 2 चे उदघाटन करण्यात आले.यावेळी राजीव गोलिवार यांनी डॉ बोकारे यांचा बांबू निर्मित  राष्ट्रध्वज देऊन सत्कार केला.तर साक्षी कार्लेकर यांनी डॉ शेवडे यांना पुस्तक देऊन स्वागत केले.

राष्ट्रध्वजावरील अशोक चक्र सावरकरांमूळे

उणी दुणी काढण्यापेक्षा या देशाला सर्वांच्या प्रयत्नामुळे स्वातंत्र्य मिळाले हे समजून घेतले पाहिजे.अंदमानात असतांना सावरकरांनी जाती निर्मूलनासाठी सर्वांसोबत जेवण केले.10 वर्षाचे त्यांचे राजकीय आयुष्य होते.बाकी काळ त्यांचा तुरंगावासात गेला.6000 ओळींचे महाकाव्य त्यांनी अंदमानात रचले.राष्ट्रध्वजावर अशोकचक्र असावं हे सवरकरांनीच सुचवलं होतं,अशी माहिती डॉ.शेवडे यांनी दिली.

आपल्या देशाची नीती शिकविली जात नाही.

आपल्या देशात आपला गौरवशाली इतिहास शिकविला जात नाही.सशस्त्र क्रांती सांगितली जात नाही हेच नाहीतर विदुरनीती चाणक्य नीति दासबोध इत्यादी शिकविले जात नाही विदेशात दासबोधाला मॅनेजमेंट स्टडी चा उत्तम ग्रंथ म्हणून स्वीकारला गेले.आपल्या देशाची नीती शिकविली जात नसेल तर युवापिढीचा काय दोष.?असा प्रश्न डॉ शेवडे यांनी उपस्थित केला.

*”हेलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here