Home
Home चंद्रपूर चंद्रपूर जिल्ह्यातील रेल्वे विकासाला नवी दिशा,आ. सुधीर मुनगंटीवार यांची दिल्ली येथे रेल्वेमंत्र्यांशी...

चंद्रपूर जिल्ह्यातील रेल्वे विकासाला नवी दिशा,आ. सुधीर मुनगंटीवार यांची दिल्ली येथे रेल्वेमंत्र्यांशी यशस्वी बैठक. बल्लारशा–मुंबई “ताडोबा एक्सप्रेस”ला हिरवा कंदील; केंद्रीय रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव यांचा सकारात्मक प्रतिसाद आ.मुनगंटीवार यांची चंद्रपूर–पुणे रेल्वेचीही आग्रही मागणी. अमृत भारत स्टेशन योजनेतील बल्लारशाह–चंद्रपूर स्थानकांच्या कामांना गती देण्याचे रेल्वेमंत्र्यांचे निर्देश. रेल्वे अतिक्रमणधारकांना मिळणार मोबदला.

0
43

HELLO CHANDA NEWS

      चंद्रपूर,(का. प्र.) : नवी दिल्ली येथे राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्य मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव यांची भेट घेत चंद्रपूर जिल्ह्यातील रेल्वे विकासाच्या विविध महत्त्वपूर्ण प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली. या बैठकीत बल्लारशा ते मुंबई थेट रेल्वेगाडी सुरू करण्याची आग्रही मागणी करत या गाडीला “ताडोबा एक्सप्रेस” असे नाव देण्याचा प्रस्तावही आ. मुनगंटीवार यांनी मांडला.

      ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या जागतिक ओळखीला साजेशी ही रेल्वे सेवा ठरेल, असे त्यांनी नमूद केले. या मागणीची दखल घेत रेल्वेमंत्र्यांनी प्रारंभी आठवड्यातून एक दिवस ही रेल्वे सुरू करण्याबाबत सकारात्मक भूमिका घेतली असून पुढे सेवा वाढविण्याबाबतही अनुकूल संकेत दिले आहेत.

              दिल्ली येथे पार पडलेल्या या बैठकीला भाजपाचे जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, अजय दुबे सदस्य ZRUCC मध्य रेल्वे मुंबई, रेल्वे विभागाचे संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते.

  बैठकीदरम्यान लोकमान्य टिळक टर्मिनल बल्लारशा एक्सप्रेस गाडी फेऱ्या वाढविणे, चांदा फोर्ट रेल्वे स्थानकावर अनियमित व फार उशिराने चालणाऱ्या रेल्वे गाड्यांचे वेळापत्रकाचे पालन होण्यावर भर देण्याबाबत, चांदा फोर्ट रेल्वे स्थानकावर सुपर एक्सप्रेस गाड्यांच्या थांब्या बाबत, बल्लारपूर आणि चंद्रपूर परिसरातील विविध प्रलंबित रेल्वे विकासकामांवर चर्चा करण्यात आली.

         बल्लारपूर आणि चंद्रपूर येथे लवकरच प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करण्याची विनंती करण्यात आली.

           चंद्रपूर येथील श्री महाकाली मातेच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक येत असल्याने नांदुरा येथे सुपरफास्ट गाड्यांचा थांबा होणे आवश्यक असल्याचे आ. मुनगंटीवार यांनी नमूद केले. नांदुरा रेल्वे स्थानकावर हिसार सुपरफास्ट एक्सप्रेस, ओखा–दरभंगा सुपरफास्ट एक्सप्रेस, जोधपूर–बेंगळुरू सुपरफास्ट एक्सप्रेस आणि पुणे–काशी एक्सप्रेसला थांबा देण्याची मागणी त्यांनी रेल्वेमंत्र्यांकडे केली.

      यावर संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक निर्देश देत सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन रेल्वेमंत्र्यांनी दिले.

         रेल्वे लाईनलगत सुरू असलेल्या अतिक्रमण हटविण्याच्या कारवाईबाबतही आ. मुनगंटीवार यांनी ठाम भूमिका मांडली. संबंधित नागरिकांवर अन्याय होऊ नये तसेच योग्य पुनर्वसनाशिवाय कोणतीही कारवाई होऊ नये, अशी मागणी आ.सुधीर मुनगंटीवार यांनी केली.

               यावर रेल्वेमंत्र्यांनी तातडीने पुनर्वसनाबाबतही सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिले तसेच अतिक्रमतांना मोबदला देण्यासाठी अनुकूल असल्याचे सांगितले.

   याशिवाय चंद्रपूर–पुणे साप्ताहिक रेल्वेगाडी आठवड्यातून तीन दिवस सुरू करणे, चेन्नई–छपरा गंगा-कावेरी एक्सप्रेस (क्र. 12670/12669) दररोज धावविणे तसेच बल्लारशा–लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) रेल्वेसेवा सी एस टी एम पर्यंत वाढविण्याबाबत चर्चा झाली.

या सर्व मागण्यांवर रेल्वेमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

        मारोडा रेल्वे क्रॉसिंग परिसरातील नागरिकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावरही आ. मुनगंटीवार यांनी प्रभावीपणे भूमिका मांडली. मारोडा येथे अंडरब्रिजऐवजी रोड ओव्हर ब्रिज (आरओबी) उभारण्याची मागणी करण्यात आली होती. यावर रेल्वेमंत्र्यांनी रेल्वे विभागामार्फत नवीन डिझाईन तयार करण्यात आल्याची माहिती दिली.

          नव्या आराखड्यात भविष्यात पाणी साचणार नाही, यासाठी विशेष उपाययोजना करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

    तसेच या सुधारित कामाची अंमलबजावणी लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

    तसेच बाबूपेठ–सास्ती परिसरातील रेल्वे प्रकल्पासाठी भूसंपादन करताना शेतकऱ्यांना योग्य मोबदला देणे, वर्धा–सेवाग्राम–बल्लारशा तिसरी रेल्वे लाईन आणि डम्पिंग यार्ड प्रकल्पासाठी आवश्यक जमीन अधिग्रहणास मंजुरी देणे, तिसऱ्या रेल्वे लाईनच्या अधिग्रहणात अतिक्रमितांना घरांचा योग्य मोबदला देणे, अशा विविध महत्त्वपूर्ण मागण्या आ. मुनगंटीवार यांनी रेल्वेमंत्र्यांसमोर मांडल्या.

      या सर्व मागण्यांवर सकारात्मक भूमिका घेत निश्चित मार्ग काढण्यात येईल, असे आश्वासन केंद्रीय रेल्वेमंत्र्यांनी दिले.

चंद्रपूर-बल्लारशा रेल्वे स्थानकाच्या विकासाला मिळणार गती.

    अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत बल्लारशाह आणि चंद्रपूर रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाची कामे तातडीने पूर्ण करण्यात यावीत, अशी आग्रही मागणी आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव यांच्याकडे केली.

 या कामांना मंजुरी मिळूनही अपेक्षित गतीने कामे होत नसल्याचे आ. मुनगंटीवार यांनी निदर्शनास आणून दिले.

  यावर रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव यांनी संबंधित अधिकाऱ्यांना कामे जलदगतीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले असून, प्रवाशांना आधुनिक आणि सुसज्ज सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक कार्यवाही तातडीने करण्यात येईल, असे आश्वासन दिले.

आ.मुनगंटीवार यांच्या बैठकीतील प्रमुख मागण्या.

  बल्लारशा–मुंबई “ताडोबा एक्सप्रेस” सुरू करणे,चंद्रपूर–पुणे साप्ताहिक रेल्वे आठवड्यातून तीन दिवस सुरू करणे,नांदुरा येथे सुपरफास्ट गाड्यांना थांबा,गंगा-कावेरी एक्सप्रेस दररोज चालविणे. बल्लारपूर अयोध्या नवीन गाडी सुरू करणे

रेल्वे विकासासंदर्भातील महत्त्वाचे निर्णय.

   केंद्रीय रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव पुनर्वसन व मोबदल्याबाबत बाबत सकारात्मक भूमिका मारोडा अंडरपाससाठी नवीन डिझाईन मंजूर,अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत पूर्व चंद्रपूर रेल्वे स्थानकावरील कामे गतीने पूर्ण करण्याचे निर्देश

आ. मुनगंटीवार यांचा विशेष आग्रह

      ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाला साजेशा रेल्वे सुविधा उपलब्ध करून देणे, शेतकरी व अतिक्रमितांना न्याय्य मोबदला देणे, यासोबतच चांदा फोर्ट, चंद्रपूर आणि बल्लारशा परिसरातील रेल्वे सुविधांचा विकास याबाबत महत्त्वपूर्ण निर्णय.

*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,9860030082*                     *कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069* *बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻*Gmail 📨⬆️⏬* *shashithakkar2409@gmail.com**9860030082*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here