चंद्रपुर जिल्ह्यातील पुर परस्थितिच्या पार्श्वभूमीवर आ. सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हाधिकारी श्री अजय गुल्हाने यांच्यासह जिल्ह्यातील सर्व प्रमुख अधिका-यांसह तसेच भाजपा पदाधिकारी व लोकप्रतिनिधीसह झूम द्वारे संवाद साधत मीटिंग घेतली. पुरामुळे विस्कळीत झालेले जनजीवन पूर्वपदावर येईपर्यंत मदतकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले. ज्या भागात पाणी शिरले असेल तेथील नागरिकांना नजीकच्या विद्यालयांमध्ये हलविणे , स्वच्छतागृहांची व्यवस्था ,उत्तम भोजनाची अल्पोपहाराची व्यवस्था करण्यासाठी पुढाकार घ्यावा असे निर्देश त्यांनी दिले. प्रत्येक तालुकास्तरावर मदतीसाठी टोल फ्री नम्बर प्रसिद्ध करावे, विहिरीमध्ये ब्लीचिंग पावडर , तुरटी आदी शुद्धिकरण साहित्य टाकावे , साथीचे रोग उद्भवु नये म्हणून पुर ओसरल्या नंतर फिरते आरोग्य पथक जिल्ह्यात सर्वदूर पाठवावे ,पुरग्रस्त नागरिकांना आवश्यकते नुसार धान्य व जीवनावश्यक वस्तुंच्या कीटस पुरवाव्या, अनेक गावांमध्ये खंडित झालेला विज पुरवठा पूर्ववत करावा , गंगापुर टोक , चारवट , भटाळी , लाडज या गावांच्या पुनर्वसनाचा प्रश्न निकाली काढावा, रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून गोठे बांधावे ,मनपा व नगर परिषदांनी रस्ते नुकसानाचा आराखडा तयार करावा , स्वच्छता मोहीम व फवारणी मोहीम राबवावी असे निर्देश त्यांनी जिल्हाधिकारी व भाजपा पदाधिका-यांना दिले.
क्षतिग्रस्त रस्त्यांचे बांधकाम व ऊंच पुलांच्या बांधकामाचा स्वतंत्र आराखडा तयार करण्याचे निर्देश त्यांनी सावर्जनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता श्रीमती साखरवाडे यांना दिले. यावेळी जिल्हाधिकारी श्री अजय गुल्हाने यांनी पुरपरिस्थिती बाबत विस्तृत माहिती दिली. नुकसानाचे पंचनामे करण्याचे काम सुरु झाले असून काही भागात पुराचे पाणी ओसरल्या वर पंचनामे सुरु होतील. प्रशासनातर्फे मदतकार्य सुरु असून कोणताही पुरग्रस्त मदतीपासून वंचित राहणार नाही याची क़ाळजी घेतली जाइल असेही जिल्हाधिकारी गुल्हाने म्हणाले . यावेळी मनपा आयुक्त राजेश मोहिते यांच्यासह सर्व तहसीलदारांनी पुर परिस्थिती व मदतकार्य याबाबतचा अहवाल सादर केला तर भाजपा पदाधिका-यांनी आपल्या भागातील समस्या मांडल्या.
पुरग्रस्ताना नुकसान भरपाई देण्या संदर्भात जे शासन निर्णय अस्तित्वात आहेत त्यात काही सुधारणा अपेक्षित असतील जेणे करून भरीव मदत मिळेल तर त्या सुधारणा त्वरित सुचवाव्या .आपण मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करू व सुधारित शासन निर्णय निर्गमित करण्याचा प्रयत्न करू असेही आ. मुनगंटीवार म्हणाले. सभेचे प्रास्ताविक भाजपा जिल्हाध्यक्ष श्री देवराव भोंगळे यांनी केले. यावेळी आ. किर्तिकुमार भांगड़िया, माजी आमदार अतुल देशकर , संजय धोटे , सुदर्शन निमकर , महानगर भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ मंगेश गुलवाड़े , माजी जि प अध्यक्ष सौ संध्या गुरनुले यांच्यासह जिल्ह्यातील प्रमुख भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.