HELLO CHANDA NEWS
चंद्रपूर,(का. प्र.) विठ्ठल मंदिर प्रभाग 15 मध्ये सुरू असलेल्या सिव्हरेज कामांमुळे परिसरातील रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुर्दशा झाली आहे.

खोदकामानंतर रस्त्यांची योग्य दुरुस्ती न केल्यामुळे नागरिकांना वाहतुकीदरम्यान मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
तसेच या कामामुळे मोठ्या प्रमाणात धूळ व प्रदूषण निर्माण होत असून फुटलेल्या गटारांमुळे परिसरात अस्वच्छता पसरली आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला असून विविध आजार पसरण्याची शक्यता वाढली आहे.
या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी श्याम बोबडे यांच्या वतीने आयुक्तांना निवेदन देण्यात आले. निवेदनामध्ये सिव्हरेज काम पूर्ण झाल्यानंतर तात्काळ रस्त्यांची दुरुस्ती करण्यात यावी, फुटलेल्या गटारांची दुरुस्ती करावी, परिसरातील प्रदूषणावर नियंत्रण आणावे तसेच संबंधित ठेकेदारांवर कारवाई करून नागरिकांना होणारा त्रास तातडीने दूर करावा, अशी मागणी करण्यात आली.
विठ्ठल मंदिर प्रभाग 15 मधील नागरिकांच्या आरोग्य व हितासाठी प्रशासनाने त्वरित सकारात्मक पावले उचलावीत, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.























