=======================
* 28 वा ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प स्थापना दिवसा निमित्त कार्यक्रमाचे आयोजन ×
=========================
आमच्या जिल्हात हमखास वाघाचे दर्शन घडणारे जगप्रसिध्द ताडोबा व्याघ्र प्रकल्प उभे आहे. याचा नक्कीच आम्हाला अभिमान आहे. मात्र हा ताडोबा स्थापना दिवस साजरा करत असतांना वन विभागाबाबत नागरिकांमध्ये निर्माण होत असलेला रोष याबाबतही चिंतन झाले पाहिजे. वनजिवांमुळे शेतपीकाचे नुकसाण, मानव – वन्यजिव संघर्ष यासारख्या घटना वाढत आहे. त्यामुळे ताडोबातील वन्य प्राण्यांच्या रक्षणासह वन्य प्राण्यांपासून नागरिकांचे रक्षण करण्याची सुद्धा गरज असुन वन विभागाबाबत नागरिकांमध्ये असलेला रोष कमी करण्याच्या दिशेने काम करण्याचा संकल्प आज या ताडोबा दिनी घ्या, असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.
==========================
28 वे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प स्थापना दिवसा निमित्त वन विभागाच्या वतीने प्रियदर्शनी इंदिरा गांधी सांस्कृतीक सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाला वने, सांकृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय तथा जिल्हाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, चंद्रपूर – वणी – आर्णी लोकसभा क्षेत्राचे खासदार बाळु धानोरकर, माजी एफडीसीएम अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक चंद्रपूर वन प्रशासन, विकास व व्यवस्थापन प्रबोधनी चे एम.एस.रेड्डी, चंद्रपूर वनवृत्त चे मुख्य वनसंरक्षक प्रकाश लोणकर, जि.प. चंद्रपूर चे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉनसन चंद्रपूर पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी, ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्प चे क्षेत्र संचालक तथा वन संरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर, कुशाग्रह पाठक, श्वेता बौधू, देवाशिष जेना, संध्याताई गुरनुले आदींची उपस्थिती होती.
===========================
यावेळी पुढे बोलतांना आ. जोरगेवार म्हणाले की, येथील जंगलाचे आणि वण्य प्राण्यांचे रक्षण करणारे आम्ही आहोत. मात्र आज आम्हाला ताडोबा सफारी करायची म्हटल तर त्याचा खर्च परवडण्यासारखा नाही. आम्ही स्वत:च जर ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्प पाहला नाही तर देशाचे गौरव असलेल्या ताडोबा अभयारण्याच्या नैसर्गीक सुंदरतेची माहिती इतरांना देऊ शकणार नाही. त्यामुळे चंद्रपूरातील नागरिकांना ताडोबा सफारीमध्ये सवलत दिल्या गेली पाहिजे. देशाचे गौरव असलेल्या ताडोबा सफारीसाठी स्थानिक विद्यर्थ्याना निशुल्क प्रवेश दिला गेला पाहिजे ही आमची मागणी राहिली आहे. चंद्रपूरातील वाढती वाघांची संख्या पहिले अभिमानाची बाब होती. मात्र आता ही बाब चिंतादायक झाली आहे. ताडोब्यात जेवढे वाघ आहे. त्याहून अधिक वाघ शहरालगतच्या जंगलांमध्ये आहे. रोज वाघ आणि बिबट यांनी मनुष्यांवर केलेल्या हल्याच्या घटना घडत आहे. या घटना टाळण्यासाही वन विभागाने नियोजन केले पाहिजे. ताडोब्यातील वण्याप्राण्यांचे संगोपन केल्या गेलेच पाहिजेच पण या सोबतच या प्राण्यांपासुन नागरिकांचेही संरक्षण करण्याची गरज आहे. वन विभागाने त्यांची यंत्रणा अद्यावत करण्याची गरज आहे. नागरिकांमध्ये जनजागृती करण्याची प्रक्रिया पुन्हा वेगाने करण्याची गरज असल्याचे यावेळी आमदार किशोर जोरगेवार म्हणाले. वनविभाग हा सर्वाधिक रोजगार उपलब्ध करून देणारा विभाग आहे. त्यामुळे वन पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार निर्मिती होणार या दिशेने काम करा. ताडोबा पर्यटनाला येणारा पर्यटक हा ताडोबा सफारी करून निघून न जाता तो चंद्रपुरातील इतर वैभवाकडे आकर्षित झाला पाहिजे असे नियोजन करा असे हि ते यावेळी म्हणाले.
=======================
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
=======================
संपादक :- शशी ठक्कर 9881277793