*************************
* नशा मुक्त भारत अभियानाचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते उद्घाटन *
************************
प्रयत्न न करता यशाच्या मागे धावणारा जेव्हा आयुष्याच्या लढाइत हरतो व नशेच्या अधीन होऊन आयुष्य खराब करता नशेच्या आहारी गेल्यावर त्याला संस्कार व मानवतेची ओळखच राहत नाही. असा व्यक्ती स्वतःच्या परिवारासह समाजाची हाणी करतो. त्यामुळे संतानी त्याकाळी सुरु केलेली व्यसमुक्तीची चळवळ पूढे नेणे आवश्यक असून शक्तिशाली राष्ट्र निर्मितीसाठी व्यसनमुक्त समाज काळाची गरज असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले आहे.
सामाजिक न्याय आणि अधिकारिता विभाग भारत सरकार, मेडिकल विंग राजयोगा एजुकेशन आणि रिसर्च फाउंडेशन चंद्रपूर तथा ब्रह्माकुमारीज यांच्या वतीने नशा मुक्त भारत अभियानाला सुरवात करण्यात आली आहे. या अभियानाचे आज आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्रमुख्य वक्ता म्हणून वैश्विक तंबाखू निर्मुलन अभियान चे प्रकल्प निर्देशक डॉ. सचिन परब यांची उपस्थिती होती तर अप्पर जिल्हा आरोग्य अधिकारी, डॉ. अविष्कार खंडारे, राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाच्या जिल्हा सल्लागार डॉ. श्वेता सावलीकर, सहायक जिल्हाधिकारी मुरुगनंधम, निवासी वैद्यकीय अधिकारी डाॅ. हेमचंद कन्नाके, ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या प्रभारी बी. के. कुंदादीदी, नरेंद्र भाई आदी मान्यवरांची मंचावर उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलताना आ. जोरगेवार म्हणाले कि, व्यसन ही समाजाला लागलेली किड आहे. ही कीड मुळापासुन काढून फेकण्यासाठी समाजाने जागृत होत व्यसनमुक्तीसाठी काम करत असलेल्या संघटनांच्या मागे ठामपणे उभे राहण्याची गरज आहे. चंद्रपूरात गांजा, ड्रग्स यासारख्या अमली पदार्थांचे सेवन करणा-यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. ही चिंतेची बाब आहे. आजचा युवक या व्यसनांकडे का वळतोय याचेही आता चिंतन झाले पाहिजे. नशेच्या आहारी गेलेल्या युवकांमुळे गुन्हांच्या संख्येतही वाढ झाली आहे. अनेक कुटुंब या व्यसनांमुळे उध्वस्त झाली आहे. त्यामुळे आता व्यसनमुक्तीसाठी मोठे प्रयत्न करण्याची गरज असुन या कामात निधी उपलब्ध करता आल्यास तो देण्याची आपली तयारी असल्याचेही यावेळी आ. जोरगेवार म्हणाले.
आपण तंबाखूचे वाईट परिणाम पाहतो. तंबाखू सेवनाने दरवर्षी लाखोंचे बळी जातात. कर्करोगाच्या आहारी युवावर्ग जात आहे. तरुण पिढी संपूर्ण पोखरली जात आहे. नशेची ही ज्वलंत समस्या आज भयंकर गंभीर रूप धारण करत आहे. दारू ही पाश्चात्यांच्या अनुकरण आणि फॅशनच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात सेवन केली जात आहे. याकडे आता गांभिर्याने लक्ष देण्याची गरज आहे. मनात ईशभय असेल तर माणूस वाईटापासून अलिप्त राहतो. तरूण वर्गात मानसिक बळ निर्माण करून आत्मनिर्भयतेने निर्णय घेण्याची क्षमता निर्माण करणे आवश्यक आहे. आपले पाल्य शाळेत कोणत्या सवयींच्या मित्रासोबत आहेत यावर पाल्यांनी लक्ष देणे आवश्यक असल्याचे यावेळी आमदार जोरगेवार म्हणाले. या कार्यक्रमाला नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
****************************
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
**************************
संपादक :- शशी ठक्कर 9881277793