देसाईगंज
हॅलो चांदा न्युज
देसाईगंज(ता.प्र.): देसाईगंज शहरात पावसाळ्याच्या सुरुवातीलाच डासांचा प्रचंड उपद्रव जाणवू लागला आहे. गटारातील साचलेले पाणी, उघड्या नाल्यांत वाढलेली घाण, आणि सार्वजनिक ठिकाणी असलेली अस्वच्छता यामुळे डासांची संख्या विक्राळ होत चालली आहे. या वाढत्या त्रासामुळे नागरिक त्रस्त असून, डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया यांसारख्या आजारांचा धोका अधिक गडद झाला आहे.
ही गंभीर स्थिती पाहता काँग्रेसचे युवा नेते पिंकू भाऊ बावणे यांनी प्रसिद्ध पत्रकाद्वारे देसाईगंज नगर परिषद प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.
शहरातील सर्व वॉर्डांमध्ये तातडीने औषधी फवारणी सुरू करावी, अशी विशेष मागणी पिंकू बावणे यांनी केली आहे.
सार्वजनिक ठिकाणांपासून ते घनदाट वस्त्यांपर्यंत डासांचा सुळसुळाट झाला आहे. नागरिकांच्या घरांत दिवसा डासांचा त्रास होतोय, तर रात्री झोपणे कठीण झाले आहे. ही परिस्थिती आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक असून याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे.
फवारणीसाठी आवश्यक यंत्रणा, मनुष्यबळ, औषधे आणि नियोजन उपलब्ध असतानाही प्रत्यक्षात कोणतीही ठोस कृती होत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
केवळ कागदावर योजना मांडून उपयोग नाही, जमिनीवर काम करावे लागते, हे प्रशासनाने लक्षात घ्यावे, असा स्पष्ट संदेश ही त्यांनी दिला.
शहराच्या प्रत्येक भागात, विशेषतः डासांची उत्पत्ती जास्त असलेल्या ठिकाणी, औषध फवारणी प्रभावी पद्धतीने करावी. एकदाच नव्हे, तर सातत्याने ही प्रक्रिया राबवावी, अशी सूचना त्यांनी एका पत्रकातून मांडली आहे.
वाढत्या आजारांपासून नागरिकांचे आरोग्य सुरक्षित ठेवणे हे प्रशासनाचे मूलभूत कर्तव्य आहे. वेळेत उपाययोजना न झाल्यास त्याचे गंभीर परिणाम संपूर्ण शहराला भोगावे लागू शकतात, असा इशाराच पिंकू भाऊ बावणे यांनी दिला आहे.























