HELLO CHANDA NEWS
सिंदेवाही,(ता.प्र.) : तालुक्यातील गुंजेवाही परिसरात आज सकाळी घडलेल्या भीषण घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. जंगलात तेंदूपत्ता तोडण्यासाठी गेलेल्या चार महिलांवर वाघाने अचानक हल्ला करून त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
मृतांमध्ये कवडू दादाजी मोहुर्ले ४५, अनु दादाजी मोहुर्ले ४६, संगीता संतोष चौधरी ३६ आणि सुनीता कौशिक मोहुर्ले ३३ यांचा समावेश आहे.

या सर्व महिला गुंजेवाही व परिसरातील रहिवासी असून रोजच्या प्रमाणे तेंदूपत्ता तोडण्यासाठी जंगलात गेल्या होत्या.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सकाळच्या सुमारास या महिला जंगलात कामात व्यस्त असताना दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक त्यांच्यावर झडप घातली.
हल्ला इतका वेगवान आणि तीव्र होता की महिलांना बचावाची कोणतीही संधी मिळाली नाही.
या भीषण हल्ल्यात चारही महिलांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच वनविभाग व पोलीस प्रशासन तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
पंचनामा करून मृतदेह पुढील तपासासाठी हलविण्यात आले असून परिसरात शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे.
संबंधित वाघाचा माग काढण्यासाठी वनविभागाने विशेष पथक तैनात केले आहे.
या घटनेमुळे गुंजेवाहीसह आसपासच्या गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
तेंदूपत्ता हंगाम सुरू असल्याने मोठ्या प्रमाणावर मजूर जंगलात जात असतात. त्यामुळे नागरिकांनी सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त करत वनविभागाने तात्काळ उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे.
दरम्यान, प्रशासनाने नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले.
असून गरज नसल्यास जंगलात जाणे टाळावे, असेही सांगितले आहे. तसेच मृतांच्या कुटुंबीयांना शासनाकडून मदत देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
या घटनेमुळे मानव-वन्यजीव संघर्षाचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला असून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
























